ओझे झाले जीवन आता अवघड बनले एकल जगणे तू नसताना कशी सखे मी पार करावी हजार वळणे वळणा वळणावर जगताना आठवणींचे बीज पेरले रेतीवरती नाव कधी तर ह्रदयाचेही चित्र कोरले सुवर्णक्षण जे कधी भावले भोगतोय त्यांचे भळभळणे तू नसताना कशी सखे मी पार करावी हजार वळणे हात तुझा सुटल्याच क्षणाला उजेड सारा हरवुन गेला खाचा, खळगे, सदैव ठेचा दु:ख पोंचले ऊंच शिगेला आठवणींनो जरा थांबवा अंधाराचे रंग उधळणे तू नसताना कशी सखे मी पार करावी हजार वळणे शुष्क वृक्ष अन् विरान घरटे नसे राबता इथे कुणाचा उदास गाणे, उदास ताना उत्सव सरला गोड सुरांचा क्षितिज असे का काजळलेले? विसरुन गेले रोज उजळणे तू नसताना कशी सखे मी पार करावी हजार वळणे आठवणींचा अंत जाहला अग्नी देता चितेस माझ्या निरव शांतता, कुणी न उरले मला द्यावया जखमा ताज्या सर्व निखारे थंड जाहले अता संपली खदखद, जळणे तू नसताना कशी सखे मी पार करावी हजार वळणे एकेकाळी चाहुल येता तुझी, होतसे अधीर वेडा करार माझ्याशी मी केला बनावयाचा बधीर थोडा स्थितप्रज्ञ जाहलो नि केले बंद मला मी आता छळणे तू नसताना कशी सखे मी पार करावी हजार वळण
A
Aarav Deshmukh
family · marathi · family
12 likes
45 shares