Back to feed
A
Anaya Singh Rain · Mixed · Rain

*फारच इन्व्हॉल्व्ह होतो आपण सालं ज्यात त्यात....*- ...अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणूस "चाललो हो शेट मी आता..." असं म्हणून निघाला की कसंतरीच होतं. ....जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं.. ....आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं.. ....गणपती विसर्जनाचे वेळी "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणताना कसलासा आवंढा दाटून येतो.. .....असंच काहीसं भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी विझलेल्या पणत्या काढतानाही होतं.. ....अनेक वर्ष आपण ज्यात आनंदाने काढली ती चाळ पाडली की त्या विटामातींचे ढिगारे बघवत नाहीत. ऊनवारा पावसापासून आपलं रक्षण करणारे ते पत्रे बघितले की काहीतरी विचित्रच होतं.. ....आठवडाभर आलेले पाहुणे निघाले की अजूनही त्यांच्या चपला लपवाव्याश्या वाटतात रे... .....शाळेच्या रम्य दिवसांपासुन स्मृतीत जपून ठेवलेलं कोपऱ्यावरचं चिंचेचं झाड पावसाने पडलं की आपल्या आतमध्येही कसलीशी "पडझड" होते... .....पहिला पाऊस आला की अजुनही सुट्टी संपल्याचं दु:ख होतं.. .....ट्रॅफिक सिग्नलला भर दुपारी उपाशीपोटी माय पोराला घेऊन भीक मागताना दिसली की आपल्याच पोटात खड्डा पडतो, तिच्या आणि त्या पोराच्या काळजीने.. .....बदली झाली म्हणून गाव सोडून जाणारे शाळासोबती पुन्हा कधीही भेटण्याची शक्यता नसते ते दु:खंही असंच काहीसं... .....अनोळखी लग्नात, कोणाचीही मुलगी सासरी जाताना आपला कंठ कशाला बुवा दाटून येतो? ..... .....या आणि अशा असंख्य Involvements जपत आपण आयुष्य काढतो... .....कसलासा "ओलावा" कायम आपल्या सोबत असतो. बराचसा भिजवून टाकणारा, पण कुठेतरी आपला एक कोपरा जिवंत ठेवणारा.....! ✍

152 likes 85 shares
WhatsApp