Back to feed
A
Anaya Reddy Life · Marathi · Life

एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते. तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची. एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो, तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !" मोलकरीण हुशार असते. तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही ! ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते. काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार, हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!" आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो. जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो. जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते. तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो. जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो. तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही, पण आता का तू तुटला ?" हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते. परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले ! हा आघात मी सहन करुच शकलो नाही, म्हणुन मी तुटलो." मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही. म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका... आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणसं हिऱ्यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका...💎💎💎💎💎💎💎💎

103 likes 83 shares
WhatsApp