Back to feed
A
Asha Reddy Love · Marathi · Romantic

एका आखीव रेखीव नगरीमध्ये होती एक राजकन्या, सुखी समाधानी प्रजा, ना कारण कोणा चिंतण्या राजकन्येची सवय होती, फुलांचे तिजला वेड भारी , राजवनातून पहाटे अदृश्य होतसे फुले सारी भरवली जाई संपूर्ण खोली फुलांने झोप तिची उघडे त्याच्याच सुगंधाने केसांत तर भरे फुलांचाच बगीचा कधी ना विचार त्या बिचाऱ्या फुलदाणीचा फुलांचीच वस्त्रे फुलांचाच दागिना फुलांची पादत्राणे फुलांचाच बिछाना गुलाब कमळ जास्वंद जाई जुई चाफा मोगरा सोडले कोणास नाही ह्यात खंड करण्या ना कोणी धजावणार बालहट्ट राजकोप एकत्र कोणास मानवणार वृक्षे होई उदास हिरमुसून जाई भ्रमर पाखरे कासावीस होई उदास वारा वाहे राजवनात जैसा वाळवंटात उडवतो धूळ तैसा एक राती राजकन्येस स्वप्न पडले चक्क मोठमोठाले वृक्ष तिच्याशी बोलले "राजकन्ये, काय हा उत्पात माजविलास, फुले तोडून तू आमचाही खून केलास, फुलांची जागा ना कोणाच्या पायात, ना कोणाच्या गळ्यात कि कोणा दगडावर, त्यांचे सौंदर्य तर ह्या माझ्या फांदीवर, ज्यांस त्यांची खरी गरज ते उपाशी, मुबलक आहे सारे, फुले त्यांच्यापाशी ?, आम्ही वृक्ष, देणे हेच आमचे कर्म, पण ओरबाडणे हाच काय मानवी धर्म…" राजकन्या त्या स्वप्नाने पुरती जागी झाली तिच्या नव्या आदेशाची बातमी लगेचच पसरली भल्या पहाटे ती स्वतः राजवनात गेली त्या रंगीत फुलांत बागडणारे पक्षी पाहून ती हरखून गेली झाडे सुद्धा आनंदात सळसळत होती जणू काही पहाटेची मधुर गीते गात होती एक चाफा तिच्या पायात येउन पडला जणूकाही त्या झाडाने तिला तो आभार म्हणून दिला त्यादिवशी राजकन्या कित्येक पटीने सुंदर भासली जेव्हा त्याच एकमेव चाफ्याने तिच्या केसांची शोभा वाढवली ……

0 likes 0 shares
WhatsApp