Back to feed
D
Dhruv Joshi Love · Marathi · Romantic

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय? डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस, बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं! कवी – कुसुमाग्रज

0 likes 0 shares
WhatsApp